Monday, May 31, 2010

समुद्र आणि उंट

.


               तसे अनेक ठिकाणचे समुद्र पाहिले पण मला सर्वाधिक आवडला तो गणपतीपुळेचा समुद्र. त्या समुद्राने माझे मन एवढे काही मोहून टाकले की पुन्हापुन्हा मला गणपतीपुळ्याला जावेसे वाटते.

             पुळ्याला प्रथम गेलो होतो त्यावेळी सायंकाळ झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या रेस्टहाउसचे बुकिंग केले होते.  तिथली खोली ताब्यात घेतली,सामान ठेवले आणि हातपाय धुवुन दर्शनास निघालो.
सोबत पुष्पाही होती.गणपतीचे मंदिर अगदी जवळच होते. स्वच्छ ,सुंदर, टुमदार असे ते मंदिरही मला पाहताक्षणीच आवडले. दर्शन घेतले आणि दुसर्‍या दरवाज्याने बाहेर पडलो तो समोर समुद्राचा भव्य विस्तार दिसला. रात्र झालेली होती,किनार्‍यावर फ़ारशी गर्दी नव्हती. आम्ही वाळूत जावून बसलो. पाठीमागे परमेश्वर,
समोर परमेश्वराचेच एक सगुण रूप .. समुद्र.....
    मागून मंद आवाजात भजनाचे स्वर ऐकू येत होते. समोरून समुद्राची गाज. हे दोन ध्वनी अलगदपणे
एकमेकात मिसळून गेले होते. त्यांच्याशिवाय इतर कोणताच आवाज नव्हता .मूकपणे  आम्हीही कितीतरी वेळ पार्श्वसंगीत असलेली शांतता अनुभवीत बसून राहिलो.
      आकाशात चांदण्या उगवल्या होत्या. चंद्राची कोरही वर आली होती. लाटांवर हलकेसे सौम्य चांदणे पसरले होते.उसळणार्‍या लाटांचा आवेगही आता कमी झाला होता. गती अपरिहार्य आहे,थांबता येत नाही म्हणूनच केवळ त्या पुढे येत होत्या,मागे जात होत्या. त्यांना शक्य झाले असते तर त्याही काही काळ स्तब्ध झाल्या असत्या.  किनार्‍यावरची जवळजवळ सारी मंडळी  उठून गेली. गस्त घालणार्‍या रक्षकांच्या शिट्ट्या ऐकू येउ
लागल्या. नाइलाजाने आम्ही उठलो. खोलीवर जाऊन झोपलो. खोलीच्या मागे सुमारे दोनशे फ़ूट अंतरावर समुद्र उचंबळत होता. रात्रभर त्याची मंद गाज सतत ऐकू येत होती. भल्या पहाटे उठल्यावर मी एक हायकू लिहिला होता..............
                                                   रात्रभर समुद्र मनास खेळवत राहिला
                                                   जागवत राहिला,झोपवत राहिला
                                                  झोपवत राहिला,जागवत राहिला......
          सकाळी उठलो. समुद्रावर जऊन स्नान केले. गजाननाचे दर्शन घेतले व प्रदक्षिणा करण्यास नि्घालो.
एका मोठ्या टेकडीचा उतार जिथे संपतो तेथे गणपतीचे मंदिर आहे. दर्शन घेतले की त्या टेकडीला प्रदक्षिणा
घालण्याचा इथे रिवाज आहे.एक लहानसा सुरेख प्रदक्षिणा मार्ग बांधला आहे. ही सुमारे एक किलोमिटरची प्रदक्षिणा मन प्रसन्न करणारी होती. त्यानंतर अनेक वेळा पुळ्याला गेलो पण सकाळची प्रदक्षिणा चुकविली नाही. नवा कॅमेरा घेतल्यावर परवा पुन्हा तेथे गेलो. धुक्यातून नुकतेच प्रवेश करू लागलेले सूर्यकिरण,सोनेरी किरणात चमकणारी हिरवी पाने, मंद शीतल हवा , गोड सकाळ जणू प्यावीशी वाटत होती
                                                                                                                                                      म्य
                                                          -
.            टेकडीच्या उंच टोकावरून समुद्राचा अपार विस्तार नजरेत भरत होता. त्याचे रूप मनात व कॅमेर्‍यात साठवत पायर्‍यांनी खाली आलो. समुद्रकिनार्‍यावर अजून वर्दळ सुरु झाली नव्हती. दूरवर वाळूत मला काहीतरी रंगीबेरंगी वस्तू चमकताना दिसली. पायर्‍यावर थांबून कॅमेरा झूम करून पाहिले. तीन उंट वाळूत अगदी किनार्‍याजवळ जाऊन बसले होते. त्यांच्या पाठीवरची रंगीत कापडं प्रकाशात चमकत होती. थोड्या वेळात येथे माणसे मुले यांची वर्दळ सुरु होइल. मुले उंटावर बसण्याचा हट्ट करतील. मग उंटवाले त्यांना,आई बाबाना
उंटावर बसवून चकरा मारून आणतील. उंटांच्या कामाचा दिवस सुरु होईल.
            पण त्याला अजून वेळ होता. उंट निवांतपणे समुद्राकडे पाहात बसले होते. काय विचार चालले असतील त्यांच्या मनात? फोटोची फ्रेम मी अडजस्ट केली. चौकटीत आता अलीकडे फिकट मातकट रंगाची  वाळूची टेकडी होती. पलीकडे करड्या रंगाचे उंट बसलेले. त्यांच्या गडद तपकिरी माना. त्यांच्या अंगावर लाल पिवळी लाकडे व कापडे..किनार्‍याकडॆ येणार्‍या लाटेवरचा पांढरा शुभ्र फेस...आणि पलीकडे समुद्राचे कुठे फिकट निळे,तर कुठे गडद निळे पाणी..
          हा फोटो मला खूप आवडतो. रंगसंगती तर सुरेख जमली आहेच पण प्रभातकालीन ताजेपणा व एक निरामय निवांतता या फोटोत प्रतिबिंबित झाली आहे असे मला वाटते.

आता घेऊ या एक लहानशी विश्रांती.....पंधरा दिवसांची....                                                                                                                                                                                                                                                                                  

2 comments:

  1. Camels feel miserable near sea because it's far cry from their natural habitat. Most of them therefore die early, gruesome death.

    ReplyDelete