आयुष्यात पहिला फोटो काढला होता तो समुद्राचा,हे मी पूर्वी सांगितलेच आहे. तो फ़िल्मवर नीट उतरला नाही ही गोष्ट वेगळी.पण समुद्राची प्रतिमा माझ्या मनाच्या फ़िल्मवर नीटच उमटली होती. त्यावेळी समुद्र जो मनात येऊन बसला तो कायमचाच. समुद्रच तो. तो काय शांत बसणार? वेळोवेळी त्याला भरती येते आणि मग एखाद्या समुद्रकिनार्यावर जाऊन मनमुराद भटकावे वाटते. त्यानंतर अनेक वेळा समुद्र पाहिला. भल्या पहाटे, भर दुपारी, सायंकाळी, रात्री, उत्तररात्री, तारांकित आकाशाखाली, तर कधी शुभ्र चांदण्यात.....त्याची असंख्य रूपे पाहिली, मनात साठवली ,तशीच कॅमेर्यातही बद्ध करून ठेवली. समुद्र प्रत्येक वेळी मला नवाच वाटतो . चिरनूतन !निसर्गाची रूपं तशी चैतन् भारलेली असतात, पण समुद्राचा जिवंतपणा काही निराळाच.
सतत येत राहणार्या आणि ओसरणार्या लाटामुळे समुद्राच्या रूपाला कधी एकसुरिपणा येत नाही नवी लाट नव्या उत्साहाने किनार्याकडे धावत येते ,किनार्यावर विखुरते. समुद्र काहीसा मागे सरकतो. त्याचवेळी मागून येणारी लाट किनार्याशी गळामिठी घेण्यासाठी धावते.जीवनसातत्याचे समुद्राहून भव्य असे
दुसरे प्रतीक नाही
एकदा एका साहित्यसंमेलनासाठी गोव्यात गेलो होतो. त्यावेळी गोव्याच्या किनार्यांवर खूप भटकलो.
पाण्यात उभा असतांना मित्राने मुंबईला काढलेल्या माझ्या फोटोची आठवण झाली. किनार्यावर माझ्यासारखे अनेक जण भटकत होते. त्यापैकी एकाजवळ मी माझा कॅमेरा दिला व त्याला माझा फोटो काढण्याची विनंती केली..त्याने आनंदाने माझी इच्छा पूर्ण केली. घरी गेल्यावर मी तो फोटो संगणकावर चढविला,जुन्या अल्बममधून पुराणा फोटो शोधून काढला ,त्याला स्कॅन केले व तोही नव्या फोटोजवळ नेऊन ठेवला. दोन्ही फोटो एकत्र पाहिले तेव्हा मोठी गंमत वाटली .दोन्हीत खूप
साम्य जाणवले , तसाच बराच फरक देखील. समुद्र तसाच आहे,बदल झाला आहे तो माझ्यात . दोन फोटोत सुमारे ३५ वर्षांचे अंतर आहे. ’अंगावरून’ बरेच पाणी वाहून गेले आहे, [त्यापैकी बरेचसे अंगात साठलेलेही आहे]
..दोन्ही फोटोकडे आळीपाळीने पाहतांना एक मजेशीर विचार मनात आला. दोन्ही फोटोत तारुण्याच्या उंबरठ्यावर उभा असलेला मी आहे. फक्त पहिल्या फोटोत मी उंबरठ्यातून आत प्रवेश करतो आहे,तर दुसर्या फोटोत उंबरठ्यातून बाहेर पडायची तयारी सुरु आहे. कुठेतरी मी वाचले होते,कुठे ते आता आठवत नाही,-डोंगरावर चढणारा आणि उतरणारा दोघेही एकाच पातळीवर आले तरी ते एकाच भूमिकेत नसतात. हे दोन फोटो पाहतांना मला त्याची आठवण झाली,आणि मी त्या फोटोंचा कोलाज करून टाकला. त्यांना अक्षरश: एका पातळीवर आणले. पहिला फोटो काळापांढरा होता तर दुसरा रंगीत. दोन्हीच्या मिश्रणामुळे एक वेगळाच रंग नव्या फोटोला आला....
अनेकवेळा आपण जुने दिवस आठवतो,त्या दिवसात भटकून येतो. परत आल्यावर असाच एखादा नवा रंग मनावर चढत असेल काय?
असावा....
Saturday, May 22, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment